बीड :  बीड जिल्ह्यातील (Beed News) 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा (Crop Insurance) रक्कम मिळणार आहे. भारतीय पीकविमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली आहे. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेषकरून सोयाबीन उत्पादकांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25 टक्के अग्रीम पीकविमा देण्याच्या अधिसूचना काढायला लावल्या होत्या. 


पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेत आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. ते दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले होते. 


त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन त्यातही बीड जिल्ह्यात सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. 


आज अखेरीस भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट अग्रीम 25 टक्के पिकविमा वितरित करण्यात येणार आहे व यासाठी विमा कंपनीने 241 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली आहे.


दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका धंनजय मुंडे यांनी याआधीही जाहीर केली होती, अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे.


धाराशिव जिल्ह्यातील सर्वच 57 मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा


धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) सर्वच्या सर्व 57 मंडळाना अग्रीम पीक विमा (Crop Insurance) मिळणार असून याबाबतचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिले आहेत. विमा कंपनीने याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना दिले आहे. पूर्वी 40 मंडळाना अग्रीम विमा दिला जाणार होता. मात्र, आता वगळलेल्या उर्वरित 17 मंडळाना अशा सर्वच्या सर्व 57 मंडळाना मदत मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवत पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे.