छत्रपती संभाजीनगर : यावर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने दुष्काळ (Drought) सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील (Marathwada) दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करणार आहे. 13 व 14 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. ज्यात, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतील काही तालुके व गावांना हे पथक भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पाहणी केल्यावर 15 डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल. विशेष म्हणजे, केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख असणार आहे. 


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आठही जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकराने देखील मदत करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय पथक मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक पुण्यात एक बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला पाठवणार आहे. त्यामुळे, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.


केंद्रीय पथकात यांचा समावेश...


केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे. 


या भागात करणार पाहणी... 



  • छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात एक आणि दुसरे पथक बीडधाराशिव जिल्ह्यांत 13 डिसेंबर रोजी पाहणी करतील.

  • दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणेसोलापूर, नाशिक व जळगावमध्ये दोन वेगवेगळे पथके जातील.

  • पाहणी केल्यावर 15 डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल.


सुप्रिया सुळेंनी अधिवेशनात केली होती मागणी...


केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. राज्यात कुठे ओला दुष्काळ तर कोठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी. तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Supriya Sule : महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी