PM Kisan Sanman Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत अनेक सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात. याच योजनेच्या अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांक जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन कृषी संचालक (विस्तार आणि प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.  

  


केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करण्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.


राज्यात सध्याच्या परिस्थितीत एकूण 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या गोष्टीची गंभीर दखल घेत बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खातं उघडायचे आहे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासांत जोडले जाईल.  


बॅंक खातं आधार कार्डशी जोडण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 


या योजनेच्या लाभासाठी खाती उघडण्याची मोहीम आयपीपीबी मार्फत 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा; तर पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडीचा अंदाज