CM Eknath Shinde : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचं, शेतकरी बांधवांचं मोठं योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्यामुळं या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.


निधीची कमतरता भासू देणार नाही


बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबवण्यात यावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.




हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा : फडणवीस


बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळं राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा. या प्रकल्पाला शासन स्तरावरुन आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित मान्यवरांना प्रकल्पाची माहिती दिली.


सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.


पुणे महानगर पालिकेमार्फत जागा उपलब्ध करुन देणार


बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात 'अर्बन फूड सिस्टिम' राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रीय आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगर पालिकेमार्फत जागा आणि ओटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.