Agriculture News : सध्या खरीप हंगाम सुरु आहे. चांगला पाऊस (Rain) झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, या काळात शेतकऱ्यांना (Farmers) विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाकडून (WhatsApp number) (Department of Agriculture) व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.


तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना


कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील अशी माहिती आयुक्तांनी दिली. राज्याचे सरासरी पर्जन्यमान 463.08 मिमी असून या खरीप हंगामात 24 जुलै 2023 पर्यंत प्रत्यक्षात 457.08 मिमी म्हणजे सरासरीच्या 99 टक्के एवढा पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली आहे.


 114.64 लाख  हेक्टर क्षेत्रावर 81 टक्के पेरणी पूर्ण


खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून 24 जुलै 2023 अखेर प्रत्यक्षात 114.64 लाख  हेक्टर क्षेत्रावर 81 टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला असून प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. 24 जुलैपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 44.08 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची 39.88 लाख हेक्टर क्षेत्रावर, तूर पिकाची 9,66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 6.69 लाख हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.


पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं 


चालू खरीप हंगामाकरीता 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 19.30 लाख क्विंटल (100 टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे तसेच पावती आणि टॅग जपून ठेवावेत, असेही कृषी विभागामार्फत कळवण्यात आले आहे. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा  हेल्पलाईन क्रमांक 


खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास 8446117500, 8446221750 किंवा 8446331759 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे.  शेतकरी बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : मशागतीची कामं सुरु, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज, बियाण्यांचं काय?