Agriculture News : खरीप हंगामात (Kharif season) भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या 11 पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (Farmers) स्पर्धेत सहभागी व्हावं, असं आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture department) करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेता यावं आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.


ज्या तालुक्यामध्ये लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान पाच स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामध्ये भाग घेण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणं प्रवेश शुल्क राहणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.


उत्पादकतेच्या निकालानुसार तालुका पातळीवर निवड


एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरुन पीक कापणीवरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. यापूर्वी तालुका पातळीवर कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे यापूर्वी जिल्हा पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असणार असून  तालुका आणि जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होणार आहे.


मूग-उडीदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै


खरीप हंगामातील मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : अकोला जिल्ह्यात पावसाची दडी, फक्त 12 टक्के क्षेत्रावर पेरणी; शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती