Agriculture News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) आंदोलनाचा धसका पिक विमा कंपनीसह सरकारनं घेतला आहे. या आंदोलनामुळं शुक्रवारी (16 जून 2023) बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित 7 हजार 855 शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 कोटी 39 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जलसमाधी आंदोलन,आत्मदहन आंदोलन, मुंबईतील AIC कंपनीतील आंदोलनाच्या इशाऱ्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार 188 शेतकऱ्यांच्या खात्यावर 228.87 कोटी रुपये जमा झाले आहेत.


आपण वारंवार आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो त्याचा हा परिणाम आहे. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी व्यक्त केले. पण अजूनही जिल्ह्यात एक हजारापेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या शेतकऱ्यांना सन्मानजनक रक्कम, उशीरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. तसेच त्रुटीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळण्यासाठी आपला लढा सुरुच राहणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. विमा कंपनीनेही या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिक विमा जमा करावा, अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. 


16 जूनला इमारतीवरुन उड्या मारण्याचा दिला होता इशारा


येत्या 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला होता. यामध्ये जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला होता. त्यानंतर  AIC पीक विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील रविकांत तुपकर हे आंदोलनावर ठाम होते. मात्र, बाकीच्या मागण्या देखील प्रशासनाने मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानं रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.


 सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्ना संदर्भात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील सरकारला दिला होता.


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, बहुतांश मागण्या मान्य; आठ दिवसांचा अल्टिमेटम