Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जेन झी' (Gen Z) च्या तरुणांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असे म्हटले होते; त्यामुळे त्यांनी जंतरमंतरवरचे आंदोलन संविधानिक आहे की नाही, यावर भाष्य करावे. जर संघातून मोहन भागवत यांच्या मतापेक्षा वेगळा दुसरा आवाज निघत असेल, तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघामध्ये आपली चमचे पेरले आहेत, असा घणाघाती प्रहार खासदार संजय राऊत यांनी केला.
भाजपने केलेली आंदोलने संविधानाच्या कोणत्या चौकटीत?
संजय राऊत म्हणाले, देशातील आंदोलनांना 'संविधान विरोधी' म्हणणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. जर हे आंदोलन घटनाबाह्य असेल, तर जयप्रकाश नारायण यांचे 1975 चे आंदोलन आणि भाजपने यापूर्वी केलेली आंदोलने संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होती, याचे उत्तर संघ आणि भाजपने द्यावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतीय संविधानाला आणि तिरंग्याला मानत नाही. त्यांनी 52 वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता आणि त्यांना स्वतःचे स्वतंत्र संविधान निर्माण करायचे आहे. भाजपला ८५० खासदारांचे बळ निर्माण करून भारताचे संविधान संपवायचं असल्याचा आरोप राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी सांगितले की, 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत असलेल्या भ्रष्ट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जंतरमंतरवर तरुणांनी केलेले आंदोलन कोणत्याही परिस्थितीत घटनाबाह्य असू शकत नाही.
राम मंदिरात चोऱ्या संमतीने झाल्या का?
राम मंदिरातील चोरी आणि पप्पू यादव यांच्यावरील हल्ल्यावर राऊत यांनी भाष्य करताना सांगितले की, राम मंदिरामध्ये 400 कोटींची आणि 550 कोटींच्या दानपेटीची चोरी झाली आहे, याविरोधात आवाज उठवणे असंविधानिक असू शकत नाही राम मंदिरातील देणगी चोरीबाबत आवाज उठवणारे खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेला चाकू हल्ला दुर्दैवी आहे. संघाचे लोक या हल्ल्याचे समर्थन करत आहेत, हे संघाचे झालेले मोठे अधपतन आहे. राम मंदिरात ज्या चोऱ्या झाल्या, त्या संघाच्या आणि भाजपच्या संमतीने झाल्या आहेत का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सरकार चोरी करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला.