MahaVikas Aghadi : मित्रपक्षांना घेऊन महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा लढवणार
Maha Vikas Aghadi : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत होता, त्याला त्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. चव्हाण यांनी सांगितले की, आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगानेच होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वंदना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी बोलतानाु उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी भाजपसह मोदींचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडीकडून निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचे आभार मानण्यात आले.