मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यापाठीमागे बीडच्या भगवान गडाने आपली ताकद उभी केली आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा जाहीर केला.
याप्रकरणात भगवान गड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभा आहे, असे वक्तव्य करुन नामदेव शास्त्री महाराज यांनी भाजप आणि अजित पवार यांना मेसेज दिल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावून घ्याल, असा अप्रत्यक्ष इशारा भगवान गडाने (Bhagwangad beed) दिल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी केलेली काही वक्तव्य वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, याचा विचार झाला पाहिजे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.