मुंबई : महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीचा म्हाडाच्या कोणत्याच प्रकल्पाला अडथळा येणार नसल्याने हे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह इतर प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रकल्प लटकतील, अशी चर्चा बीडीडी चाळ तसंच मोतीलाल नगराच्या रहिवाशांमध्ये होती. या चर्चेने अनेक रहिवाशांनी शंका निरसन करण्यासाठी थेट म्हाडा कार्यालयात धाव घेतली.


सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटला नसल्याने राज्यातील या घडामोडींचा दृश्य, अदृश्य परिणाम प्रकल्पांवर होणार का, याची गृहनिर्माण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, म्हाडा प्राधिकरणाच्या मान्यता मिळालेल्या आणि मार्गी लागलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेत कोणतीही बाधा उद्भवणार नसल्याचं म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह इतर प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा तर फडणवीस सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. त्यामुळे आता हे सरकार नसल्याने या सर्वच प्रकल्पांच्या पूर्ततेत काही अडचणी येतील का, हा प्रश्न या प्रकल्पांशी संबंधित रहिवाशांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.

म्हाडाने प्रकल्पांना दिलेली मान्यता, प्राधिकरण बैठकीत झालेले ठराव, राज्य सरकार स्तरावर झालेली त्यांची नोंद, त्यासंदर्भातील घेण्यात आलेले निर्णय, स्थानिक रहिवाशांची साधलेला संवाद, संमती आदी प्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे म्हाडाकडील मार्गी लागलेल्या कोणत्याही प्रकल्पांमध्ये अडचणी येणार नसल्याची ग्वाही मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

म्हाडाकडून रितसर मान्यता लाभलेले सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ज्येष्ठ अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलं आहे. या सर्व प्रकल्पांना मान्यता असून, ती प्रक्रिया सातत्याने सुरुच होती. त्यामुळे त्यात पुढचा टप्पा गाठण्यात अडचणी येणार नसल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.