Zero Hour Maratha Marriage Code of Conduct : लग्नाची आचारसंहिता पाळली जाईल की धूळ खाईल? ABP MAJHA

नसस्कार मी प्रसन्न जोशी. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. समाज आणि संस्कृती हे प्रवाही असतील तरच ते चांगल्या प्रकारे पुढे जातात. आपल्यातील चांगुलपणानं जसा समाज विकसित होत असतो, तसंच कधी कधी काही अनिष्ट प्रथा, पद्धती यांच्या अतिरेकामुळे समाजातीलच मान्यवरांना, ज्येष्ठांना पुढाकार घेत अशा गोष्ट बाजूला सारुन समाजाला पुढे घेऊन जावं लागतं. लग्नापूर्वी असो की लग्नामध्ये...यातील देणं-घेणं, लग्नाचा थाट, जेवणावळी, फोटोशूट, मानपान या सगळ्यांनी विवाहसोहळे अतिमहागडे होऊ लागले. मोठ्यांच्या वागण्याचं सामान्यांकडूनही अनुकरण होऊ लागलं. यातून कर्जबाजारीपण, सासरकडच्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि अशी वारेमाप उधळपट्टी म्हणजेच समाजातली आपली इज्जत. अशी भावना रुजली. मात्र, वैष्णवी हगवळे बळी प्रकरणानं मराठा समाजात एक घुसळण झाली. जाणत्या, सजग मराठा मान्यवरांनी विचारमंथन केलं. आणि यातूनच समोर आली मराठा विवाह सोहळ्यांसाठीची आदर्श आचारसंहिता. मराठा बांधवांनी ही आचारसंहिता बनवली असली, तरी ती सर्वच समाजांसाठी मार्गदर्शक आहे. दुसरीकडे, हुंडा हा एकाच समाजाचा मुद्दा नसून ही समस्या सर्वांनाच कशी भेडसावतेय ते दाखवणारी घटना संभाजी नगरात घडली. इथं एका मुस्लिम महिलेला हुंड्यासाठी छळण्यात आलं. वस्तुत: इस्लाममध्ये हुंडाच नाही. यावरुनच, अशा कुप्रथा कशा सर्वांमध्ये पसरल्या आहेत हे कळतं. म्हणूनच, हुंडा असो की लग्नाचा थाटमाट त्यातील अनिष्ट प्रकारांवर चर्चा करण्यासाठी आहे आजचा झिरो अवर...