Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

दोन शिवसेनांमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत आज एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला... सध्या शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाण हे शिवसेनेचं परंपरागत निवडणूक चिन्ह गोठवा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली... एकतर चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली... यावरून शिवसेना नेत्यांनी आता भावनिक मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केलीये... शिवसेनेच्या चिन्हाबाबत आज काय घडलं, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट.
धनुष्यबाण...
३५ वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेशी घट्ट नातं असलेलं निवडणूक चिन्ह...
उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर झालेल्या कायदेशीर लढाईत चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आलं...
मात्र आता हे चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रथमच केली...
पक्ष आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी पुढे केली...
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष उध्दव ठाकरेंचाच आहे...
निर्णय होऊ शकत नसेल तर धणुष्यबाण चिन्ह गोठवलं जायला हवं...
चिन्हाचे सगळे फायदे एकनाथ शिंदेंनी घेतले आहेत...
त्यांना धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून देणं न्यायाला धरून नाही...
हे चिन्ह आम्हाला किंवा त्यांना मिळू शकत नसेल, तर ते गोठवलंच पाहिजे...
असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला...
स्थापनेपासून म्हणजे १९६६ सालापासून १९८८ अशी २० वर्षं धनुष्यबाण आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता...
अगदी सुरुवातीला शिवसेनेचे उमेदवार अपक्षांसाठी राखीव असलेल्या चिन्हांवर निवडणुका लढवत असत...
१९६७-६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना 'ढाल-तलवार' हे एकच चिन्ह मिळालं...
१९७० ते ८० या काळात विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये रेल्वे इंजिन आणि उगवता सूर्य ही चिन्हं शिवसेनेनं वापरली...
१९८५ साली 'मशाल' या अपक्षांसाठी राखीव चिन्हावर लढलेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार झाले...
१९८९ साली निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला बहाल केलं...
२०२२ मधल्या पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या कायदेशीर वादात चिन्ह काही काळासाठी गोठवण्यात आलं होतं...
त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल आणि शिंदेंच्या गटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं...
फेब्रुवारी २०२३मध्ये निवडणूक आयोगानं शिंदेंचा गट हीच मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा देत चिन्ह त्यांच्या पक्षाला दिलं...
आता प्रथमच हे चिन्ह कायमचं गोठवण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे आलीये...
आणि तीदेखील पत्रकार परिषदेत नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयात...
याबाबत कोर्ट जो निवाडा करेल, तो दोन्हीकडच्या तमाम शिवसैनिकांसाठी केवळ कायदेशीर मुद्दा नसेल...
तर भावनिकही असेल...