Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?

वर्षोनुवर्ष पक्षासाठी सगळं करायचं... नेत्यांचा प्रचार करायचा.. सभास्थळी खुर्च्या उचलायच्या... दिवस असो की रात्र.. नेत्याच्या एका फोन कॉलनंतर हजर राहायचं.. मात्र जेव्हा उमेदवारी जाहीर करण्याची वेळ येते तेव्हा हेच कार्यकर्ते पक्षाला दिसेनासे होतात.. काल परवा आलेल्यांना तिकीट मिळतं.. आणि १० ते १५ वर्षे पक्षाशी निष्ठा बाळगून असणाऱ्यांना डावलंल जातं.. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच निष्ठावंतांचा आज उद्रेक झाला...कुणा लाखोल्या वाहून संताप व्यक्त केला तर कुणी अश्रूच्या माध्यमातून भावनाना वाट मोकळी करून दिली..
१८ वर्षे भाजपसाठी कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या... भाजपासाठी अंगावर १८-१८ केसेस घेणाऱ्या... या आहेत दिव्या मराठे... संभाजीनगर महापालिकेसाठी पक्षानं उमेदवारी न दिल्यानं त्या मंत्री अतुल सावेंना जाब विचारण्यासाठी निघाल्यात
अतुल सावे भेटत नाही म्हटल्यावर दिव्या मराठेंनी तिथेच ठिय्या मांडला..
पक्षानं तिकीट नाकारल्याचं समजताच
सुवर्णा माताडेंना अश्रू आवरणं कठीण झालं होतं
वेळप्रसंगी लेकराबाळांकडे दुर्लक्ष करून, पक्षासाठी काम केलं.. मात्र जेव्हा तिकीट वाटपाची वेळ आली, तेव्हा कालपरवा पक्षात आलेल्यांच्या डोक्यावर कमळाची फुलं पडली.. त्यामुळे एकीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता तर दुसरीकडे तिकीट वाटप करणारे अतुल सावे आणि भागवत कराड केबिनबाहेर येण्याचं नाव घेत नव्हते..
अखेर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला... तेवढ्यात श्रीअण्णा भंडारी नावाच्या कार्यकर्त्यानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला पेट्रोलची बाटली वेळीच हिसकावून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला
दिव्या मराठे असो.. सुवर्णा माताडे असो... किवा श्रीअण्णा भंडारी ... या तिघांप्रमाणे आज शेकडो कार्यकर्त्यांना पश्चात्ताप होतोय... आपण पक्षासाठी दिवसरात्र झटलो ही आपली घोडचूक होती याची त्यांना जाणीव झालीय...
आपल्याच कार्यकर्त्यांना सामोरं जाण्याचं धाडस भाजप नेते अतुल सावे आणि भागवत कराड दाखवू शकले नाही कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला असताना... कार्यकर्त्यांच्या मनात संतापाचा निखारा धगधगत असताना... अतुल सावे मागच्या दारानं निघून गेले... एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणत स्वतःला पाहिजे तशी राजकीय समीकरणं जन्माला घालायची.. आणि या समीकरणातून निष्ठावान कार्यकर्त्यांनाच वगळायचं! छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कुणाची सत्ता येईल ते १६ जानेवारीला कळेलच... मात्र या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षानं लढण्याआधीच हरवलंय एवढं नक्की