Indiav Navy Rescue : नौदलाचं शौर्य, समुद्राच्या मधोमध वादळी कामगिरी, खवळलेल्या समुद्रात बचावकार्याचा थरार
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 18 May 2021 10:58 PM (IST)
मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या मच्छिमारांसाठी नौदलाचे देवदूत धावून आलेत. काल रात्रभर सुरु असलेल्या ऑपरेशन दरम्यान 273 पैकी 146 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलं आहे. अनेकांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. चक्रीवादळात अनेक बोटी आणि जहाजं खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या होत्या. नौदलानं ऑपरेशन राबवत बोटी आणि जहाजांवर अडकलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं. त्यासाठी नौदलाची बचाव मोहीम रात्रभर सुरु होती. तोक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या पी-305 या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी आज सकाळी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत. मुंबईच्या समुद्रातील आयएनएस शिख्रा या युद्धनौकेवरून ही हेलिकॉप्टर्स रवाना झाली.