Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी टी 20 विश्वषचक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात या सामन्याला सुरुवात होईल. या अंतिम सामन्यात सध्या फॉर्ममध्ये नसलेला वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) आणि अभिषेक शर्मा हे दोघे खेळणार की नाही, याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुण चक्रवर्तीला संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. बहुतेक प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी वरुण चक्रवर्तीची चांगलीच धुलाई केली आहे. उपांत्य फेरीच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्ती याने अवघ्या 4 षटकांमध्ये 64 धावा दिल्या होत्या. मोक्याच्या क्षणी विकेट घेणे तर सोडाच पण वरुण चक्रवर्ती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी हल्ला चढवल्यानंतर दबावाखाली येताना दिसला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्ती याला संघात ठेवले जाणार की नाही, याबाबत साशंकता आहे. 

Continues below advertisement

अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला वरुण चक्रवर्तीच्या संघातील समावेशाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी सूर्यकुमार यादवने म्हटले की, वरुण चक्रवर्तीच्या फॉर्मची टीम व्यवस्थापनाला चिंता वाटत नाही. संघाला त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे, असे सूर्याने म्हटले. त्यामुळे वरुण चक्रवर्ती अंतिम सामन्याच्या Playing 11 मध्ये असेल, असा निष्कर्ष काहीजणांनी काढला.

मात्र, या पत्रकार परिषदेनंतर भारतीय संघाच्या सरावावेळी घडलेल्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वी भारतीय संघाचा जेव्हा जेव्हा सराव झाला आहे, तेव्हा वरुण चक्रवर्ती सर्वात आधी मैदानावर येताना दिसत होता. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाच्या सरावावेळी पुढे न येता बाजूला उभा राहून सराव करताना दिसला. त्याचवेळी कुलदीप यादव मात्र नेहमीपेक्षा लवकर सरावासाठी मैदानात आला होता. कुलदीप यादव संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला आहे. मात्र, त्याने काल त्याने मैदानात बराचकाळ सराव केला. त्यामुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

वरुण चक्रवर्तीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खूप धावा दिल्याने तो महागडा ठरला आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी 186 धावा कुटल्या आहेत. मात्र, वरुण चक्रवर्ती हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 13 बळी टिपले आहेत. मात्र, अजूनही त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

आणखी वाचा

T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस