Team India चेन्नई : भारताचा टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 मधील लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला होता. या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर 107 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. तर, दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. यामुळं भारत उपांत्य फेरीत कशाप्रकारे पोहोचणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासाठी सध्या तीन समीकरणं महत्त्वाची आहेत. यापैकी दोन समीकरण अशी आहेत, ज्यात नेट रनरेटचा मुद्दा येत नाही. एका समीकरणामध्ये नेट रनरेटचा विचार करावा लागतो. नेट रनरेटचा मुद्दा आल्यास ते समीकरण भारतासाठी अडचणीचं ठरु शकते. 

भारतानं सुपर 8 मधील तीन पैकी एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. उपांत्य फेरीची आशा जिवंत ठेवायची असल्यास भारताला दोन सामने जिंकावे लागतील. एका सामन्यात जरी भारताचा पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. आतापर्यंत ग्रुप 1 मधील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी प्रत्येकी एका सामन्यात विजय मिळवला आहे.  भारत आणि झिम्बाब्वेचा पराभव झाला आहे. 

Continues below advertisement

पहिलं समीकरण

टीम इंडिया टी 20  वर्ल्ड कपवर आपल्या बळावर पोहोचू शकते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं राहिलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. म्हणजे त्यांचे सुपर 8 मधील गुण 6 होतील. यानंतर भारतानं राहिलेले दोन्ही सामने जिंकावेत यात भारताचे गुण 4 होतील. या स्थितीत नेट रनरेटचा मुद्दा येणार नाही. दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह आणि भारत 4 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. वेस्ट इंडिजकडे  2 गुण असतील आणि झिम्बाब्वेनं सर्व सामने गमावल्यानं त्यांच्या खात्यात एकही गुण नसेल, अशी स्थिती झाल्यास भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. 

दुसरं समीकरण

दुसऱ्या समीकरणाचा विचार केला असता दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिज विरुद्ध पराभव झाल्यास आणि भारतानं राहिलेल्या दोन मॅच जिंकल्यास आणि दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेला पराभूत केल्यास नवं चित्र निर्माण होईल. भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे 4-4 गुण असतील. यावेळी उपांत्य फेरीत नेट रनरेटचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. सुपर 8 मधील शेवटचा सामना भारताचा असल्यानं त्यात नेट रनरेट सुधारण्याची संधी भारताकडे असेल. 

तिसरं समीकरण

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेकडून पराभव झाल्या, त्यांच्याकडे 2 गुण राहतील. या स्थितीत भारत दोन्ही सामने जिंकून 4 मिळवू शकतो. भारत आणि वेस्ट इंडिज 4-4 गुणांसह सुपर 8 मध्ये पोहोचू शकतो. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेकडे 2-2 गुण राहू शकतात.