Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय?
India Vs New Zealand : गेल्या वर्ल्ड कपच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी टीम इंडियाने यावेळी निवासाचं हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून सोशल मीडियामध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

T20 World Cup 2026 Final : टी20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने एक वेगळाच निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची आठवण टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदल करत असल्याचे समोर आले आहे. पण हे बदल संघातील खेळाडूंमधील नाहीत तर ते वेगळ्याच गोष्टीमध्ये केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील हॉटेल आणि स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे ‘जिंक्स’ किंवा नकारात्मक इतिहास मोडण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
Team India Superstition : अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची श्रद्धा की अंधश्रद्धा?
मीडिया रिपोर्टनुसार, 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यावेळी भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमध्ये यावेळी संघ थांबणार नाही. त्यावेळी संघ आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये होता. याशिवाय नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही टीम इंडिया ‘होम’ ड्रेसिंग रूमऐवजी ‘व्हिजिटिंग टीम’च्या ड्रेसिंग रूमचा वापर करू शकते, अशी माहिती समोर येत आहे. हा निर्णय काही प्रमाणात संघाच्या आध्यात्मिक किंवा अंधश्रद्धेशी जोडूनही पाहिला जात आहे.
ICC Protocol : आयसीसीच्या नियमांमुळे हॉटेल निवडीवर परिणाम
आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, अहमदाबादमध्ये फायनलमध्ये पोहोचलेल्या पहिल्या संघाला आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये ठेवले जाते. तर दुसऱ्या फायनलिस्ट संघासाठी ताज स्कायलाईन हॉटेलची व्यवस्था असते.
2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलवेळी भारत आयटीसी नर्मदामध्येच थांबला होता. त्यामुळे यावेळी संघाने वेगळा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. मात्र ड्रेसिंग रूम बदलण्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Narendra Modi Stadium Record: अहमदाबादमध्ये भारताचा टी20 रेकॉर्ड कसा?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने आतापर्यंत 10 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने भारताने जिंकले आहेत, तर 3 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
या स्पर्धेतही भारताने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत. नेदरलँड्सविरुद्ध भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाला होता. हा पराभव या स्पर्धेतील भारताचा एकमेव पराभव ठरला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या





















