Abhishek Sharma: सलग चार सामन्यात अपयश, सूर्या अभिषेक शर्माला वगळणार? झिम्बाब्वेविरुद्ध कोणाला संधी?
Abhishek Sharma: सलामीवीर अभिषेक शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सलग चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अभिषेक शर्माला संधी मिळते का ते पाहावं लागेल.

Abhishek Sharma, IND vs ZIM Super-8 चेन्नई : भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. सलग तीन सामन्यात खातं उघडू न शकलेला अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 धावा करुन बाद झाला. सलग चार सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला टीम मॅनेजमेंट झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर ठेवणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिषेक शर्माला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय झाल्यास टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देऊ शकते जाणून घेऊयात.
अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात सुपर 8 मधील पहिल्या लढतीत 15 धावा करुन बाद झाला. यानंतर सलामीवीर म्हणून भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनानं अभिषेक शर्माला बाहेर ठेवत संजू सॅमनसला संधी द्यावी, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
झिम्बाब्वेसोबत पुढील सामना
भारताचा सुपर 8 मधील पुढचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध 26 फेब्रुवारीला होणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचायचं असल्यास भारताला पुढील झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. यामुळं कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेईंग 11 मध्ये बदल करावे लागू शकतात. यामुळं सलामीवीर अभिषेक शर्माला वगळून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
संजू सॅमनसला या वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. संजू सॅमसननं नामिबिया विरुद्ध 22 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. मात्र, अभिषेक शर्माच्या तुलनेत त्याची कामगिरी चांगली आहे. आता सूर्यकुमार यादव संघात बदल करणार का ते पाहावं लागेल.
भारत एक पराभव झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर
भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव स्वीकारला. यामुळं भारतावर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट आहे. जर, भारत राहिलेल्या दोन पैकी एका मॅचमध्ये पराभूत झाला तर त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपेल.
दरम्यान, भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. आता भारत त्याची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. भारताचा प्रवास सुपर 8 मधील एका पराभवामुळं खडतर झाला आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा संभाव्य संघ
संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

























