मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एक वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर शिखर धवनची भारतीय संघात वापसी झाली आहे. मात्र, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला संघातून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे.


यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी भारतीय गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे अश्विन आणि जाडेजा यांच्या पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे. या दोन्ही खेळाडूंचं गेल्या काही दिवसातलं प्रदर्शन पाहिलं तर आकडेही निराशाजनक आहेत. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली आणि निवडकर्त्यांनी या दोघांना पसंती दिली नसल्याचं बोललं जात आहे.

वन डेत अश्विनच्या दोन वर्षात 10 विकेट

फिरकीपटू अश्विनची वन डेतील कामगिरी गेल्या दोन वर्षांपासून निराशाजनक आहे. कारण त्याने गेल्या दोन वर्षांमध्ये खेळलेल्या 11 वन डे सामन्यांमध्ये केवळ 10 विकेट घेतल्या आहेत. 2016 मध्ये त्याने 6.73 च्या इकॉनॉमी रेटने दोन वन डे सामन्यात 2 विकेट घेतल्या. तर 2017 मध्ये 5.73 च्या इकॉनॉमी रेटने त्याला 9 वन डे सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेता आल्या.

दरम्यान टी-20 मध्ये अश्विनने चांगली कामगिरी केली. 2016 साली खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 23 विकेट आहेत. तर यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या एकमेव टी-20 मध्ये त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.

जाडेजाची निराशाजनक कामगिरी

रवींद्र जाडेजानेही गेल्या दोन वर्षांमध्ये खेळलेल्या 15 वन डेमध्ये केवळ 10 विकेट घेतल्या आहेत. 2016 मध्ये खेळलेल्या 5 वन डे सामन्यांमध्ये जाडेजाच्या नावावर 3 विकेट होत्या. तर 2017 मध्ये त्याला 10 सामन्यांमध्ये केवळ 8 विकेट घेता आल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीत फ्लॉप

यावर्षी जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत या फिरकीपटू जोडीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अश्विनने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 3 सामन्यात केवळ 1 विकेट घेतली. तर जाडेजानेही 4 सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोघांनी एकही विकेट न घेता 18 षटकात 137 धावा दिल्या होत्या.

कुलदीप, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल फॉर्मात

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या रुपाने टीम इंडियाला फिरकीपटूंची उणीव भासू न देणारा गोलंदाज मिळाला आहे. कुलदीपने यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय वन डे कारकीर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यातील 10 इनिंगमध्ये त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. त्याचं इकॉनॉमी रेट 4.78 आहे.

यजुवेंद्र चहलनेही गेल्या दोन वर्षात खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. तर 9 टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 15 विकेट आहेत. 6/25 ही त्याची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

दुसरीकडे अक्षर पटेल गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. गेल्या तीन वर्षांमध्ये खेळलेल्या 36 वन डेमधील 33 इनिंगमध्ये त्याच्या नावावर 44 विकेट आहेत. तर 20 इनिंगमध्ये त्याने 181 धावाही केल्या आहेत.

संबंधित बातमी :  न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड