नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत काही अनपेक्षित बदल केल्यामुळे कर्णधार विराट कोहली दिग्गजांच्या निशाण्यावर आला आहे. भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनला अंतिम अकरा जणांमधून वगळल्याने जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही विराटवर निशाणा साधला आहे.


सेन्चुरियनमधील ‘करो या मरो’ कसोटीत जर चांगली कामगिरी करण्यात विराट कोहली अपयशी ठरला तर त्याने स्वतःलाही अंतिम अकरा जणांमधून वगळावं, असं सेहवागने म्हटलं आहे.

''शिखर धवन केवळ एकाच कसोटीत अपयशी ठरला होता आणि भुवनेश्वरला वगळण्याचं काहीही कारण नव्हतं. त्यामुळे आता या कसोटीत विराट अपयशी ठरला तर त्याने पुढच्या कसोटीत खेळू नये'', असं सेहवाग म्हणाला.

''भुवनेश्वर कुमारला वगळणं हा चुकीचा निर्णय होता. इशांत शर्माला उसळत्या गोलंदाजीसाठी त्याच्या उंचीचा फायदा होईल. मात्र विराटने भुवनेश्वरच्या आत्मविश्वासालाही धक्का पोहोचवला आहे'', असं म्हणत सेहवागने विराटवर निशाणा साधलाय.

''संघ व्यवस्थापनाने इशांत शर्माला इतर गोलंदाजांच्या जागी खेळवणं अपेक्षित होतं. मात्र केपटाऊनमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरला वगळण्याचा निर्णय चुकला'', असं सेहवागने स्पष्ट केलं.

संबंधित बातमी :

सर्वात यशस्वी गोलंदाज बाहेर, विराटच्या निर्णयावर आश्चर्य