नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीत सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा शानदार द्विशतक झळकावलं. या मालिकेतलं विराटचं हे सलग दुसरं, यंदाच्या वर्षातलं तिसरं तर कसोटी कारकीर्दीतलं एकूण सहावं द्विशतक ठरलं. एवढे द्विशतक ठोकण्याची प्रेरणा कुठून येते, याचं उत्तर विराटने दिलं आहे.


टीम इंडियातील सहकारी खेळाडू चेतेश्वर पुजाराकडूनच शिकलो आहे, की शतकाचं रुपांतर द्विशतकामध्ये करायचं आणि एकाग्रता कशी टिकवून ठेवायची, असं विराट म्हणाला. जून 2016 पूर्वी विराटच्या नावावर एकही द्विशतक नव्हतं. मात्र गेल्या 18 महिन्यात त्याने 6 द्विशतक ठोकले आहेत.

दिल्ली कसोटीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआय टीव्हीसाठी चेतेश्वर पुजाराने विराटची मुलाखत घेतली. 18 महिन्यात 6-6 द्विशतकं ठोकल्यानंतर काय वाटतंय, असा प्रश्न पुजाराने विचारला. यावर विराटने मजेशीर उत्तर दिलं.

''केवळ मीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संघाने मोठी खेळी करायचं हे ज्याच्याकडून शिकलं आहे, तो दुसरा तिसरा कुणी नसून पुजारा आहे'', असं विराट म्हणाला. पुजाराला टीम इंडियाची नवी वॉल म्हटलं जातं. त्याचं नाव द वॉल राहुल द्रविडच्या नावाशीही जोडलं जातं.

संबंधित बातम्या :

विराटचं आणखी एक द्विशतक, सर्वाधिक द्विशतक ठोकणारा एकमेव कर्णधार


विराटने पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडला!


विराट कोहली पाच हजारी मनसबदार