...म्हणून विराट कोहलीनं कोटयवधी रुपयांची जाहिरात नाकारली
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2017 11:35 AM (IST)
'मी शीतपेय पित नाही, त्यामुळं इतरांनी शीतपेय प्यावं म्हणून मी भलामण करणार नाही.' असं कारण विराटनं जाहिरात नाकारतानं दिलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं कोट्यवधी रुपयांची शीतपेयाची जाहिरात नाकारून एका नवा आदर्श घालून दिला आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेत्या पुलेला गोपीचंद यांच्यानंतर शीतपेयाची जाहिरात नाकारणारा विराट हा दुसरा मोठा खेळाडू ठरला आहे. उत्तम आरोग्यासाठी आपण जी पथ्यं पाळतो, त्यावर ठाम राहणं आवश्यक आहे, असा विराट कोहलीचा मुद्दा आहे. ‘सोप्या भाषेत सांगायचं, तर मी शीतपेय पित नाही, त्यामुळं इतरांनी शीतपेय प्यावं म्हणून मी भलामण करणार नाही.’ असं विराटनं ‘द हिंदू’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. दरम्यान, विराटनं शीतपेयाची जाहिरात नाकारली असली तरी सोशल मीडियावरुन त्याला दुसऱ्याच गोष्टीवरुन सुनावलं जात आहे. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या जाहिरातीतून विराटनं मद्यउत्पादक पुरस्कर्त्यांची भलामण कशी केली? असा सवाल सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.