मुंबई : विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या विश्वचषक विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. साखळी सामन्यांमध्ये गुणतालिकेत अव्वल क्रमाकांवर असलेल्या टीम इंडियाचं स्वप्न केवळ एका निसटत्या पराजयाने धुळीला मिळालं. त्यानंतर, आयपीएलप्रमाणे विश्वचषकाच्या नॉकआऊट फेऱ्यांमध्येही प्लेऑफ सामने असावेत, असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुचवलं आहे.


न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 45 मिनिटांतच भारताने सामना गमावला होता, अशी कबुली विराटने दिली. त्यामुळे साखळी फेरीत पहिल्या स्थानावर येऊनही कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांचा स्वप्नभंग झाल्याच्या भावना कोहलीने व्यक्त केल्या. साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकत, 15 गुण मिळवून अव्वल ठरत भारताने उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली होती. मात्र उपान्त्य फेरीतच विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ भारतावर आली.

आयपीएलप्रमाणे वर्ल्डकपमध्येही भविष्यात प्लेऑफ सामने असावेत का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. 'भविष्यात कोणी पाहिलंय? कदाचित. गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाचाही विचार व्हायला हवा. विश्वचषकाचं महत्त्व लक्षात घेता निश्चितच बदल करायला वाव आहे' असं मत कोहलीने व्यक्त केलं.

प्ले ऑफ सामन्यात नेमकं काय?

सामना 1 - उपान्त्य फेरीतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये लढत. पराभूत संघ बाहेर

सामना 2 - उपान्त्य फेरीतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये लढत. विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट

सामना 3 - सामना 1 मधील विजेता विरुद्ध सामना 2 मधील पराभूत संघ. पराभूत संघ बाहेर

सामना 4 - सामना 2  मधील विजेता विरुद्ध सामना 3 मधील विजेता.

अशा पद्धतीमुळे उपान्त्य फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना दुसरी संधी मिळण्यालाही वाव असतो. ही पद्धत आयपीएलमध्ये अवलंबली जाते.

दरम्यान, एखाद्या संघाची विश्वचषकातील आधीची कामगिरी पूर्णतः पुसली जाते, हे उपान्त्य फेरीचं वैशिष्ट्यच मानायला हवं, असं कोहली म्हणतो. 'तुम्ही आधी काय केलं आहे, ते महत्त्वाचं नाही. हा एक नवा दिवस आहे. नवीन सुरुवात. जर तुम्ही पात्र नसाल, तरी मायदेशी परत जा' असंही विराटने पुढे जोडलं.

59 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकार ठोकत 77 धावांची खेळी उभारणाऱ्या अष्टपैलू रवींद्र जाडेजाचं कौतुक करताना कोहली थकत नव्हता. सातव्या विकेटसाठी त्याने धोनीच्या जोडीने चांगली भागिदारी केली, असं कोहली म्हणाला.

न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. राहुल, रोहित आणि विराट हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती.