मुंबई : विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य लढतीत रोहित शर्माच्या वादग्रस्त झेलनंतर आणखी एक वाद झाला. हैदरबादची फलंदाजी संपल्यानंतर उत्तरादाखल मैदानात उतरलेला मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात शाब्दिक वाद रंगला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सिराज आणि शॉ एकमेकांना काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालं, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाही.


मुंबईच्या डावाच्या आठव्या षटकात मोहम्मद सिराज आपल्या बाऊंसरने 18 वर्षीय पृथ्वी शॉला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडूनंतर सिराज शॉला काहीतरी बोलतो. त्यामुळे नाराज झालेल्या पृथ्वी शॉने मोहम्मज सिराजच्या या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर सडेतोड उत्तर दिलं. पृथ्वीने या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार ठोकून सिराजची लय बिघडवली.


मुंबई अंतिम फेरीत  
पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशकताच्या जोरावर मुंबईने बुधवारी (17 ऑक्टोबर 2018) हैदराबादला व्हीजेडी पद्धतीनुसार 60 धावांनी पराभूत करत, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. मुंबईसमोर 247 धावांचं लक्ष्य होतं. 25 षटकांत मुंबईने दोन विकेटच्या मोबदल्यात 155 धावा केल्या होता. मात्र तेव्हाच जोरदार पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही. व्हीजेडी पद्धतीनुसार मुंबईची तेव्हाची धावसंख्या दोन विकेटच्या मोबदल्यात 96 धावा अशी हवी होती. परंतु धावसंख्या जास्त असल्याने मुंबईला विजयी घोषित केलं.