Vaibhav Sooryavanshi Viral Video: भारत 'अ' संघ तिरंगी मालिकेतील सामना श्रीलंका 'अ' संघाकडून सुपर ओव्हरमध्ये हरला. दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, श्रीलंका 'अ' संघाने सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारत 'अ' संघ केवळ 10 धावाच करू शकला. सुपर ओव्हरमध्ये भारत 'अ' संघाकडून सूर्यांश शेडगे आणि वैभव सूर्यवंशी फलंदाजीसाठी आले, पण त्या दोघांनाही सामना पूर्ण करता आला नाही.

Continues below advertisement

वैभव सुर्यवंशीला कारवाईचा झटका

श्रीलंका 'अ' संघाने भारत 'अ' संघावर विजय मिळवल्यानंतर मैदानावर गोंधळ उडाला. श्रीलंकेचे खेळाडू जल्लोष करू लागले आणि येथूनच ड्रामा सुरु झाला. वैभव सूर्यवंशी संतापला आणि त्याचा एका श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाशी वाद झाला. यावेळी तो मारण्यासाठी सुद्धा धावला आणि धक्काबुक्की केली. शेडगेने 'बेबी बॉस'ला मागे खेचले, पण 15 वर्षीय वैभव मैदान सोडण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दोन्ही संघांनी सौहार्दपूर्णपणे हस्तांदोलन केले आणि सामना तिथेच संपला. मात्र, अवघ्या 15 वर्षीय वैभवच्या वर्तनाची चर्चा रंगली. समालोचकांनी खेळ भावना राखली पाहिजे म्हणत कान टोचले.  

सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव 

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून कुगाथास मथुलनने गोलंदाजी केली होती. सुपर ओव्हरमध्ये, सूर्यांश शेडगेने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, तर दुसरा चेंडू निर्धाव होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. आता वैभव सूर्यवंशी स्ट्राईकवर होता. वैभवला चौथ्या चेंडूवर केवळ दोन धावा करता आल्या, ज्यामुळे इंडिया 'ए' संघावर पूर्ण दबाव आला. त्यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही.

सामना सुपर ओव्हरमध्ये गेला

या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंडिया 'ए' संघाने 49.2 षटकांत 265 धावा केल्या. इंडिया 'ए' संघाकडून सूर्यांश शेडगेने 72 धावा आणि विप्रज निगमने 51 धावांचे योगदान दिले. वैभव सूर्यवंशी फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंका 'ए' संघाकडून विजयकांत व्यासकांत आणि मोहम्मद शिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात, श्रीलंका 'ए' संघाने आपल्या निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 265 धावा केल्या, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सदीरा समरविक्रमाने श्रीलंकेसाठी शानदार 93 धावा केल्या, पण शेवटच्या षटकात तो बाद झाल्याने यजमान संघ अडचणीत सापडला. श्रीलंकेच्या डावातील शेवटचे षटक अर्शद खानने टाकले, ज्यात त्याने केवळ 4 धावा दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या