कोलकाता : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.


टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 202 धावांत गडगडला.

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं या सामन्यात हॅटट्रिक साजरी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भुवनेश्वर कुमारनं तीन, तर हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली.

त्याआधी, या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचूनही, भारताचा अख्खा डाव 50 षटकांत 252 धावांत आटोपला.

कर्णधार विराट कोहलीचं एकतिसावं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 107 चेंडूंत आठ चौकारांसह 92 धावांची खेळी उभारली. अजिंक्य रहाणेनं सलामीला 64 चेंडूंत सात चौकारांसह 55 धावांची खेळी केली.