कटक : विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्याच्या मालिकेतली दुसरी वन डे उद्या कटकमध्ये खेळवण्यात येईल.
कटकच्या बाराबती स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताने पुण्यातल्या पहिल्या वन डेत इंग्लंडवर तीन विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला होता. त्यामुळे कटकची वन डे जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
कटकच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा प्रामुख्याने विराट कोहली आणि केदार जाधवच्या कामगिरीकडे असतील. पुण्याच्या पहिल्या वन डेत विराट कोहली आणि केदार जाधव या दोघांनीही खणखणीत शतकं ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता.
विराटने 105 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 122 धावांची बरसात केली होती. तसंच केदारने 76 चेंडूंमध्येच 12 चौकार आणि चार षटकारांसह 120 धावांची लयलूट केली होती. त्यामुळे आता कटकच्या दुसऱ्या वन डेत विराट आणि केदार काय कामगिरी बजावतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.