मुंबई : क्रिकेटचे भीष्माचार्य आणि सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ह्रदयविकाराच्या धक्क्याने आचरेकर सरांची प्राणज्योत मालवली. आचरेकर सरांच्या निधनानंतर सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


'आचरेकर सरांच्या उपस्थितीने आता स्वर्गातील क्रिकेटही समृद्ध होईल. आचरेकर सरांच्या अनेक शिष्यांप्रमाणे मीही त्यांच्या हाताखाली क्रिकेटची बाराखडी गिरवली. माझ्या आयुष्यातील त्यांचं योगदान शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही. त्यांनी रचलेल्या पायावर मी आज उभा आहे. गेल्याच महिन्यात मी आचरेकर सरांना त्यांच्या काही शिष्यांसोबत भेटलो होतो. आम्ही एकत्र वेळ घालवला आणि जुन्या आठवणीत रमताना हास्यविनोदही केले. आचरेकर सरांनी आम्हाला आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये कायमच सरळमार्गाने खेळायला शिकवलं. आचरेकर सर, तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्याचा भाग केलंत आणि समृद्ध केलंत, त्याबद्दल आभार. वेल प्लेड सर. तुम्ही जिथे असाल, तिथे अनेकांना समृद्ध करा' अशा भावना सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या आहेत.


रमाकांत आचरेकरांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आचरेकर सरांना आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राहत्या घरातच ह्रदयविकाराचा झटका आला होता.

रमाकांत आचरेकरांना पद्मश्री, द्रोणाचार्य यासारख्या पुरस्कारांनी केंद्र सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

आचरेकर सरांची कारकीर्द

आचरेकर सरांचा जन्म सिंधुदुर्गातील मालवणमध्ये 1932 साली झाला. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक गाजली.

1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आचरेकर सर केवळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकेचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.

आचरेकर गुरुजींनी शिवाजी पार्कात कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. या क्लबचं कामकाज आता त्यांची कन्या आणि जावई पाहतात.

भीष्माचार्यांनी घडवले खंदे क्रिकेटपटू

आचरेकर सरांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार यासारखे अनेक खेळाडू घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरुन योगदान दिलं. 'रमाकांत आचरेकर : मास्टर ब्लास्टरचे मास्टर' हे चरित्र पत्रकार कुणाल पुरंदरे यांनी लिहिलं आहे.

तरच सचिनला वडापाव मिळायचा...

सचिनने लहानपणी जेव्हा क्रिकेटमधील गती ओळखली, तेव्हा सचिनचा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची गाठ आचरेकर गुरुजींशी घालून दिली. सचिनच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आचरेकर सर त्याला प्रॅक्टिससाठी मुंबईतल्या वेगवेगळ्या मैदानांवर घेऊन जात असत. सचिनने चांगला परफॉर्मन्स दिला आणि गुरुजी प्रभावित झाले, तर त्याला बक्षीस म्हणून वडापाव द्यायचे, असं म्हटलं जातं. आचरेकरांच्या तालमीत घडलेल्या सचिनने विक्रमांचा डोंगर रचला. तेंडुलकर-आचरेकर ही गुरु-शिष्याची जोडगोळी जगभरात गाजली.

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान

क्रिकेट प्रशिक्षक म्हणून 1990 साली त्यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2003 मध्ये जाहीर झाला होता. 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना 'पद्मश्री' प्रदान करुन गौरवण्यात आलं होतं.

सचिनचं गुरुवंदन

गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने आपले गुरु आचरेकर सरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केले होते. "आचरेकर सर, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो. आपल्या गुरुंना विसरु नका, त्यांचा आशीर्वाद घ्या." असं सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

बीसीसीआयची श्रद्धांजली

रमाकांत आचरेकरांच्या निधनाबद्दल बीसीसीआयने ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. आचरेकरांनी केवळ उत्तम क्रिकेटपटूच तयार केले नाहीत, तर त्यांना माणूस म्हणूनही घडवलं, या शब्दात बीसीसीआयने आदरांजली वाहिली आहे.