Rohit Pawar: 'तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल? या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं' रोहित पवारांचा थेट गर्भित इशारा
मी 'इव्हेंट' किंवा 'स्टंट' करत आहे तर तुम्ही सत्तेत आहात, तर सत्तेचा वापर करून केवळ राजकारण करण्यापेक्षा अजितदादांचा एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

Rohit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा काकी (सुनेत्रा पवार) या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आहेत. परंतु, सार्वजनिक कार्यक्रमात किंवा स्टेजवर वागत असताना ते चार नेते त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागत आहेत, ते चुकीचे आहे. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, तर कोणी त्यांना ओढतंय, हे बघून महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं वाटत नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला आहे. मी 'इव्हेंट' किंवा 'स्टंट' करत आहे तर तुम्ही सत्तेत आहात, तर सत्तेचा वापर करून केवळ राजकारण करण्यापेक्षा अजितदादांच्या मृत्यूचा एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
केवळ दोन वर्षांचा विषय का दाखवला गेला?
कार्यक्रमात दादांची 40 वर्षांची कारकीर्द दाखवण्याऐवजी केवळ दोन वर्षांचा विषय का दाखवला गेला? दादांचे मोठे कार्य त्या व्हिडिओमध्ये छोटे दाखवण्याचा प्रयत्न झाला, याची खंत वाटते, अशी टीकाही त्यांनी केली. अजित दादांच्या निधनानंतर पवार साहेब इतके भावूक झाले होते की त्यांना शब्द फुटत नव्हते, म्हणून त्यांना काही गोष्टी लिहून वाचाव्या लागल्या. यात आम्ही राजकारण केलेले नाही, असे रोहित पवार यांनी नमूद केलं
थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं
रोहित पवारांनी या चार नेत्यांना इशारा दिला की, "जर कोणाला वाटत असेल की अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल (नियंत्रित) करू शकतो, तर ते भ्रमात आहेत. त्यांनी सांगितले की, काकी सक्षम आहेत आणि पवार कुटुंबातील घटक आहेत, त्यामुळे या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं, असा सज्जड दम त्यांनी भरला.
तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल
त्यांनी एका व्हिडिओचा हवाला देऊन सांगितले की, हे चार लोक अजितदादांना त्यांच्या स्वतःच्या आमदारांपासून आणि कार्यकर्त्यांपासून लांब ठेवत होते. जर एखाद्या नेत्याला आमदारांपासूनच हे चार लोक लांब ठेवत असतील, तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे चार नेते केवळ स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी काही विषयांना विनाकारण जिवंत ठेवत आहेत. दादांचा या नेत्यांवर वचक होता, पण आता त्यांनी सुनेत्रा काकींचा आदर राखला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या























