Rohit Sharma Retirement: सध्या टीम इंडिया (Team India) इंग्लंड (IND vs ENG) दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना कार्डिफ इथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाचा 4 विकेट्सनी पराभव केलाय. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे. आणि याच तिसऱ्या वनडे सामन्यानंतर भारताचा 'हिटमॅन' (Rohit Sharma Retirement) आपली निवृत्ती जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 2027 च्या विश्वचषकात 'रोको'ची जोडी दिसणार नाही, असंच एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळतेय. 

Continues below advertisement

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माची कारकीर्द सध्या अनिश्चिततेनं घेरली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 19 जुलैला लॉर्ड्सच्या वनडेनंतर रोहितची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. एका अहवालानुसार, भारतीय निवड समितीनं 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीनं नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचं त्याला कळवण्यात आल्याचं समोर आलंय. आता याच चर्चांदरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रविचंद्रन अश्विन यानं टीम इंडिया व्यवस्थापन आणि सिलेक्टर्सना तिखट प्रश्न विचारलेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची संघात आता गरज नाही, असं वाटावं यासाठी व्यवस्थापन आणि सिलेक्टर्स प्रयत्न करत आहेत का? असा थेट सवाल रवीचंद्रन अश्वीन यानं विचारला आहे.

रवीचंद्रन अश्वीनचा सिलेक्टर्सवर थेट निशाणा (Ravichandran Ashwin On Selectors)

Continues below advertisement

रविचंद्रन अश्विननं आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हटलंय की, "यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संधीची वाट पाहतोय... पण, सिलेक्टर्स, प्रशिक्षक किंवा निर्णय घेणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, जर काही खेळाडूंना 2027 च्या वनडे विश्वचषकात खेळवायचं नाही असं आधीच ठरवलं असेल, तर त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच त्याबद्दल त्वरित कळवायला हवं होतं..."

स्वतःचं उदाहरण देत अश्विननं नमूद केलं की, बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत भारतीय संघानं धमाकेदार कामगिरी केली असली, तरी न्यूझीलंडविरुद्ध मात्र संघ अपयशी ठरला. या खराब कामगिरीची वैयक्तिक जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं त्यानं सांगितलं. अश्विननं पुढे असंही नमूद केलं की, जेव्हा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा व्यवस्थापनाला आपण संघात असावं असं वाटत नव्हतं, अशी त्याला जाणीव झाली होती.

"रोहितची आता गरज नाही..."

आर. अश्विन पुढे बोलताना असंही म्हणाला की, प्रत्येकाला एक खराब मालिका खेळण्याचा हक्क असतो. या अनुभवी स्पिनरनं स्पष्टपणे सांगितलं की, जर एखाद्या खेळाडूला संघात आपली गरज नाही असं वाटू लागलं, तर त्याच्या कामगिरीवर परिणाम होणं अटळ आहे. 

अश्विन म्हणाला की, "जर त्यांच्यापैकी कोणालाही असं वाटलं की, व्यवस्थापनाला त्यांची आता गरज नाही, तर दोन गोष्टी घडतील. पहिली, ते आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाहीत; आणि दुसरी, संघात असतानाही, त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून येईल..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर