Champions Trophy 2025 : सध्या जगभरात चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. भारताने मात्र पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच भारताचे (India) सर्व सामने हे पाकिस्तानच्या (Pakistan) बाहेर होणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानात सुरू असलेल्या या स्पर्धेवर दहशतीचं सावट आलं आहे. याच कारणामुळे पाकिस्तान सध्या हायअलर्टवर आहे.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानमध्ये यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होत असल्यामुळे जगभरातील क्रिकेटचे चाहते या देशात जात आहेत. याच परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाकिस्तानमध्ये निर्माण झाला आहे. तशी माहिती पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. परिणामी या सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. परदेशी नागरिकांची काळजी घेण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतोय.
नेमकी दहशत कोणाची?
इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी इन्टेलिजन्स ब्युरोने सुरक्षा यंत्रणांना नुकताच एक अहवाल दिला आहे. या अहवालात इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हियन्स (ISKP) या संघटनेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीतील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना धोका आहे. खंडणीसाठी या परदेशी नागरिकांचे अपहरण केले जाऊ शकते, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे. पाकिस्तानी इन्टेलिजन्स ब्युरोच्या अहवालानुसार ही संघटना विशेषत: चीन, अरबी नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यासाठी या संघटनेच्या लोकांनी बंदरे, विमानतळ, कार्यालये तसेच निवासी भागात आधीपासूनच पाळत ठेवण्यास सुरूवात केली आहे. याच कारणामुळे आता पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफीवर आता दहशतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :