नागपूर : कर्णधार विराट कोहलीच्या दमदार द्विशतकामुळे टीम इंडियाला नागपूर कसोटी जिंकण्याची नामी संधी आहे. कारण, सध्या टीम इंडियाच्या हाताशी पहिल्या डावात 405 धावांची भक्कम आघाडी आहे. तर टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मानं नागपूर कसोटीत श्रीलंकेला खातं उघडण्याआधीच पहिला धक्का दिला.


ईशांतनं सदिरा समरविक्रमाचा शून्यावरच त्रिफळा उडवला. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरू थिरीमनेनं श्रीलंकेला तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 धावांची मजल मारून दिली.

नागूपर कसोटीत भारतानं आपला पहिला डाव सहा बाद 610 धावांवर घोषित केला. त्यामुळं टीम इंडियाच्या हाताशी पहिल्या डावात 405 धावांची आघाडी आहे. या कसोटीत अजूनही दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळं टीम इंडियाला ही कसोटी जिंकण्याची नामी संधी आहे.

विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं दमदार पाचवं द्विशतक

विराट कोहलीने कारकीर्दीतलं पाचवं द्विशतक झळकावून, नागपूर कसोटीवर टीम इंडियाची पकड आणखी घट्ट केली. विराटचं हे यंदाच्या मोसमातलं दुसरं कसोटी द्विशतक ठरलं. त्याने 259 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह या द्विशतकाला गवसणी घातली. 213 धावांवर तो बाद झाला.

विराटने रोहित शर्माच्या साथीने पाचव्या विकेटसाठी दीडशेहून अधिक धावांची अभेद्य भागीदारी रचली. रोहित शर्माही कसोटी शतकाच्या दिशेने कूच करत आहे. या कसोटीत टीम इंडियाने चहापानानंतर चार बाद 570 धावांची मजल मारली. त्यामुळे भारताच्या हाताशी साडे तीनशेहून अधिक धावांची आघाडी झाली आहे.

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने मोठी मजल मारली. उपहारापर्यंत चेतेश्वर पुजारा 143 आणि विराट कोहली 124 धावांवर खेळत होते.

कसोटीत सर्वाधिक वेगाने 19 शतकं

कसोटीत विराटने 19 शतकं पूर्ण केले. एवढ्या वेगाने 19 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याने 104 इनिंगमध्ये 19 शतकं पूर्ण केले.

विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. सचिनने 105 कसोटींमध्ये 19 शतकं पूर्ण केले होते. कसोटीत सर्वाधिक वेगाने 19 शतकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.

विराटचं कर्णधार म्हणून बारावं शतक, सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे. नागपूर कसोटीत मुरली विजय, चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही दमदार शतक झळकावलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 19वं शतक ठरलं.

10 चौकारांसह विराटने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतील सलग दुसरं शतक साजरं केलं. कर्णधार या नात्याने विराटचं हे बारावं कसोटी शतक ठरलं. त्यामुळे या शतकासोबतच विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनिल गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला.

गावसकर यांनी कर्णधार असताना कसोटीत 11 शतकं ठोकली होती. दरम्यान कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 373 धावांची मजल मारली आहे. सोबतच या कसोटीवर भारताने आपली पकड आणखी मजबूत केली.

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हाच सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांनी टीम इंडियाने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली होती. टीम इंडियाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली होती.

मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्याने 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही 284 चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली. पुजाराचं कारकीर्दीतलं हे 14 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली.