मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2017 12:02 AM (IST)
डर्बी : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली. इंग्लंडवर 35 धावांनी मात करुन कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाने दणदणीत विजय साजरा केला. भारताने इंग्लंड महिला संघाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाज 246 धावांमध्येच गारद झाल्या. दिप्ती शर्मा 3, शिखा पांडे 2 आणि पूनम यादवने घेतलेल्या एका विकेटच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना स्वस्तात रोखता आलं. इंग्लंडचा अख्खा संघ केवळ 246 धावांचीच मजल मारु शकला. या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने अर्धशतक ठोकून सलग 7 अर्धशतक ठोकण्याचा विश्व विक्रम केला. यासोबतच तिने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. मिताली राजने चारलेट एडवर्ड्सला मागे टाकत वन डे कारकिर्दीतलं 47 वं अर्धशतक पूर्ण केलं. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सध्या मिताली राजच्या नावावर आहे. वन डे क्रिकेटमध्ये 47 अर्धशतक ठोकणारी मिताली राज पहिलीच महिला क्रिकेटर बनली आहे. अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत मिताली राज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्याही पुढे आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 185 वन डे सामन्यात 42 अर्धशतक केले आहेत. दुसरीकडे मिताली राजने 178 सामन्यांमध्येच 47 अर्धशतकं पूर्ण केले आहेत. तर तिच्या नावावर 5 शतकांचाही समावेश आहे. विराटच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये एकूण 27 शतकं आहेत.