मुंबई : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने विजय मिळवला. मुंबईतील वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाने श्रीलंकेवर 5 गडी राखून मात केली. फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली.


संपूर्ण टी-20 आणि वन डे मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणारे कुलदीप आणि चहल हे आता भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनले आहेत. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची जागा त्यांनी भरुन काढली आहे. ‘मेरे दो अनमोल रतन’ असं कॅप्शन देत रोहित शर्माने या दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे.


चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेच्या फलंदाजांना जेरीस आणलं. या टी-20 मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली. आतापर्यं त्याने केवळ 8 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या खात्यात 18.50 च्या सरासरीने 12 विकेट आहेत.

यजुवेंद्र चहलनेही गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात त्याचं स्थान पक्क केलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या 14 टी-20 सामन्यात त्याच्या नावावर 26 विकेट्स आहेत. एकाच सामन्यात सहा फलंदाजांना माघारी पाठवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.