जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


सरावादरम्यान फलंदाजी करताना राहुल इशांत शर्माच्या गोलंदाजीवर जखमी झाला. इशांतने टाकलेला चेंडू थेट राहुलच्या डाव्या गुडघ्याला लागला. त्यामुळे या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?

25 वर्षीय के एल राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. मात्र फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे आणि उपकर्णधारालाच सलग दोन सामन्यांमध्ये संधी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा कसोटी सामना 24 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेत आधीच 2-0 ने पिछाडीवर आहे. आता राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर नवं संकट उभं राहिलं आहे.

दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला व्हाईटवॉश देईल : कागिसो रबादा