RCB IPL Final 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा (RCB vs PBKS Ipl Final 2025) 6 धावांनी पराभव करून आयपीएल 2025 चं जेतेपद जिंकलं. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात आरसीबीचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. यावेळी आरसीबीने प्रथम खेळताना 190 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाबचा संघ फक्त 184 धावा करू शकला.

2008 पासून ते आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलमध्ये अफाट लोकप्रियता कमावली आहे. मुंबई आणि चेन्नईसारखेच आरसीबी फ्रॅन्चायझीचेही कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहलीला (Virat Kohli) तर या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. या चाहत्यांचं गेल्या 18 वर्षांपासून एकच स्वप्न होतं, आरसीबीनं आयपीएल ट्रॉफी जिंकावी आणि ती काल रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. 

विराट कोहलीच्याही अश्रूंचा बांध फुटला-

गेली 18 वर्ष एकाच संघाकडून खेळलेला आयपीएलमधला एकमेव खेळाडू...अर्थात विराट कोहली. आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत अनेक खेळाडू आले आणि गेले. पण आरसीबीच्या टीम लिस्ट मध्ये आजही एक नाव कायम आहे ते म्हणजे विराट कोहली. पण याच विराट कोहलीला आणि आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र लागला 18 वर्षांचा काळ. अहमदाबादच्या स्टेडियमवर आरसीबीनं पंजाबला हरवून अंतिम सामना जिंकला तेव्हा विराट कोहलीच्याही अश्रूंचा बांध फुटला.

Ee Sala Cup Namde पासून Ee Sala Cup Namdu पर्यंतचा प्रवास-

आरसीबी जेतेपद जिंकण्याआधी सोशल मीडियावर Ee Sala Cup Namde असं वाक्य वापरलं जात होतं. कन्नड भाषेत Ee Sala Cup Namde म्हणजे यावेळी कप (आयपीएलची ट्रॉफी) आपला आहे. आता आरसीबीने तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. यानंतर आता Ee Sala Cup Namdu असं बोललं जात आहे. Ee Sala Cup Namdu म्हणजे आता कप (आयपीएलची ट्रॉफी) आपला आहे. आयपीएलमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीसह कर्णधार रजत पाटीदारने Ee Sala Cup Namdu, असं म्हणत बंगळुरुला ट्रॉफी समर्पित केली. 

सामना कसा राहिला?

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 190 धावा केल्या. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय रजत पाटीदारने 26 धावा आणि जितेश शर्माने 24 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच संघ मोठा धावसंख्या उभारू शकला. बंगळूरुने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला 20 षटकांत 7 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर कृणाल पांड्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि चार षटकांत दोन बळी घेतले. पंजाबकडून शशांक सिंगने 30 चेंडूंत सर्वाधिक 61 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि 6 षटकार मारले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

संबंधित बातमी:

RCB IPL 2025: Ee Sala Cup Namdu...जिंकले, हसले, रडले; आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन; भावूक करणारे PHOTO

Virat Kohli Celebration : मैदानावर रडला… सावरला आणि जल्लोषात ट्रॉफी उचलली; विराट कोहली आणि RCBचे जोरदार सेलीब्रेशन, पाहा Photo