Hardik Pandya Captain: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार.. अशी चर्चा होती. पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिली आहे. 2013 पासून रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले होते.  (Hardik Pandya announced as captain for the IPL 2024 season)


मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी 20 संघाची धुराही दिली जातेय.


रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी 20 सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. मुंबईच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी कौतुक केलेय.  मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतलाय. 





हार्दिक पांड्याचं आयपीएल करियर - 


हार्दिक पांड्याने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर तो गुजरातच्या ताफ्यात गेला. गुजरातला त्याने पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्याशिवाय गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत उपविजेता ठरला होता. मुंबईसाठी हार्दिक पांड्या सहा वर्ष खेळलाय. त्यानंतर त्याने गुजरातची वाट धरली होती. आता तो मुंबईच्या ताफ्यात परतलाय. त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा संभाळली. 


रोहितचं आयपीएल करियर -


रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती.  2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.