Mumbai Indians vs Gujarat Titans IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्स संघाशी झाला. या सामन्यात चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्याचा विजेता खेळाच्या शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर रात्री 12:40 वाजता निश्चित झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 विकेटच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. गुजरातच्या डावात दोनदा पाऊस पडला. जेव्हा पहिल्यांदा 14 व्या षटकात पाऊस आला, तेव्हा संघाची धावसंख्या 2 बाद 107 धावा होती. डकवर्थ लुईस नियमांनुसार संघ पुढे होता. यानंतर, 18 वे षटक संपताच पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यावेळी संघ 5 धावांनी मागे होता. यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. गुजरातला एका षटकात 15 धावांचे लक्ष्य मिळाले. संघ शेवटच्या चेंडूवर जिंकला. या विजयामुळे गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अगदी बरोबर असल्याचे सिद्ध केले. गुजरातविरुद्ध सलामीवीर रायन रिकल्टन (2) आणि रोहित शर्मा (7) यांना लवकरच घरचा रस्ता दाखवला. यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाची धुरा हातात घेतली आणि वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली.

विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी राखली लाज 

दोन्हीच्या वादळी खेळीमुळे तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची मौल्यवान भागीदारी केली. सूर्यकुमार 24 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा करून आऊट झाले. साई किशोरने त्याची शिकार केली. त्यानंतर लगेचच रशीद खानने सेट फलंदाज जॅकला (53) आऊट करून एमआयचे कंबरडे मोडले. या दोन धक्क्यांनंतर हार्दिक पांड्याची सेना सावरू शकली नाही.

मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू ढेपाळले...

तिलक वर्मा (7), हार्दिक पांड्या (1) आणि नेहल वधेरा (7) कधी आले आणि निघून गेले हे कळलेच नाही. एके क्षणी, असे वाटत होते की संपूर्ण एमआय संघ 130-135 धावांवर ऑलआऊट होईल, परंतु कॉर्बिन बॉशने हार मानली नाही आणि शेवटच्या षटकांमध्ये षटकांचा पाऊस पाडला आणि 22 चेंडूत 27 धावा केल्या, ज्यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अशाप्रकारे, संपूर्ण षटक खेळल्यानंतर, मुंबईने 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. गुजरातकडून साई किशोरने 2 विकेट घेतल्या. सिराज, अर्शद खान, कृष्णा, राशिद खान आणि कोटझिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

शुभमन गिल आणि जोस बटलर नडले...

गुजरातचा संघ 156 धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे मानले जात होते, परंतु त्यांची सुरुवात पण खराब झाली. दुसऱ्याच षटकात ट्रेंट बोल्टने साई सुदर्शनला आऊट केले. सुदर्शनच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या. यानंतर शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण 12 व्या षटकात बटलर 30 धावांवर बाद झाल्यावर 72 धावांची भागीदारी तुटली. बटलर आऊट झाला, तेव्हा गुजरातला विजयासाठी 51 चेंडूत 78 धावांची आवश्यकता होती. यानंतर रदरफोर्डने चांगली फलंदाजी केली. पण 14 व्या षटकात पाऊस पडला.

यादरम्यान गुजरातला विजयासाठी 36 चेंडूत 49 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी गुजरातचा संघ डीएलएस पद्धतीने 8 धावांनी पुढे होता. पण चांगली गोष्ट अशी होती की, काही वेळाने पाऊस थांबला. यानंतर, बुमराह गोलंदाजी करायला आला आणि त्याने गिलला आऊट केले. गिलने 43 धावा केल्या. यानंतर, पुढच्याच षटकात बोल्टने रदरफोर्डची विकेट घेतली. रुदरफोर्डने 15 चेंडूत 28 धावा केल्या. यानंतर बुमराहने पुन्हा 17 वे षटक टाकले आणि चौथ्या चेंडूवर शाहरुख खानला आऊट केले. मग अश्विनी कुमारने 18 व्या षटकात रशीद खानला आऊट केले.  

पावसाच्या ट्विस्टनंतर मुंबईचा पराभव!

पण जेव्हा गुजरातला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 24 धावांची आवश्यकता होती, तेव्हा पावसामुळे सामना व्यत्यय आला. यानंतर, गुजरातला 1 षटकात जिंकण्यासाठी 15 धावांचे लक्ष्य मिळाले, जे गुजरातने साध्य केले. राहुल तेवतियाने 8 चेंडूत 11 धावा करत सामना संपवला. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार हे त्यांच्या संघाच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो होते. ट्रेंट बोल्टने 2, बुमराहनेही 2 याशिवाय, अश्विनी कुमारने 2 विकेट घेतल्या.