MS Dhoni IPL 2026 News : रविवारी आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. या हंगामात चेन्नईसाठी खूपच खराब राहिला आहे. पॉइंट टेबलमध्ये संघ तळात आहे. आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. रविवारी मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने एक मोठे वक्तव्य केले. माही पुन्हा एकदा त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे.
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर एमएस धोनीने मान्य केले की, त्याचे खेळाडूंची रणनीती फसली. त्याने असेही सांगितले की, ते पुढील वर्षासाठी एक कोअर ग्रुप तयार करत आहेत. मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर धोनी म्हणाला, "आम्हाला बाकीचे सर्व सामने जिंकायचे आहेत. आम्ही एका वेळी फक्त एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. जर आम्ही भविष्यात काही सामने गमावले तर पुढील वर्षासाठी योग्य संघ तयार करणे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल."
धोनी पुढे म्हणाला की, "आम्ही खूप जास्त खेळाडू बदलत नाही. सध्या प्लेऑफसाठी पात्र होणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु जर तसे झाले नाही तर आमचे लक्ष पुढील वर्षासाठी 11 खेळाडू तयार करण्यावर आणि नंतर जोरदार पुनरागमन करण्यावर असेल."
चेन्नई सुपर किंग्जचा मुंबईविरुद्ध पराभव
चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर एमएस धोनीला संघाची कमान देण्यात आली होती. पण, यानंतरही संघाच्या कामगिरीत काही सुधारणा झाली नाही. रविवारी एमआयने चेन्नईचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात, चेन्नईचा संघ प्रथम खेळल्यानंतर केवळ 176 धावा करू शकला, शेवटच्या षटकांमध्ये संघाला वेगवान धावा करण्यात अपयश आले. एकेकाळी चेन्नईचा स्कोअर 16 षटकांत 3 बाद 142 धावा होता. त्यानंतर शेवटच्या 4 षटकांत फक्त 34 धावा झाल्या. प्रत्युत्तरादाखल, मुंबईने केवळ 15.4 षटकांत सामना जिंकला.
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता फक्त एकच मार्ग...
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईला उर्वरित 6 पैकी 6 सामने जिंकावे लागतील. तरच 14 सामन्यांत 8 विजयांसह 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल. पण संघाचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी पाहता, जरा कठीण वाटत आहे. एमएस धोनी संघात असल्याने काहीही अशक्य नाही, परंतु खेळाडूंच्या दुखापती आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धा सोडल्यामुळे समस्या वाढल्या आहेत.
हे ही वाचा -