MS Dhoni, CSK in IPL 2023 Playoff: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम आता रंगतदार सामन्यांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करत आहे. गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यंदाच्या सीझनचा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असून प्लेऑफच्या शर्यतीतून ते आधीच बाहेर पडले आहेत. 


चेन्नई सुपर किंग्जसह (CSK) उर्वरित 7 संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल की, नाही हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. लाडक्या धोनीला आयपीएल 2023 ची ट्रॉफी उंचावताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आयपीएलमधील प्लेऑफच्या लढतींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. 


चेन्नईचा सामना दिल्लीसोबत 


आयपीएल 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये चेन्नई 15 गुणांसह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण शेवटी ही आयपीएलच्या प्लेऑफची लढत आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. चेन्नईचा साखळी सामन्यांतील शेवटचा सामना शिल्लक आहे. हा सामना 20 मे रोजी दिल्लीविरोधात असणार आहे. 


जर चेन्नईचा संघ हा सामना हरला तर पॉईंट टेबलमध्ये त्यांचे 15 गुणच राहतील. अशा परिस्थितीत धोनीच्या संघाला सर्वात मोठा धोका लखनौ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्याकडून असेल. याचं कारण म्हणजे, पॉईंट टेबलमध्ये लखनौचे 15 गुण असून मुंबईचे 14 गुण आहेत. या दोन्ही संघांना आता शेवटचा सामना वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी जर आपापले सामने जिंकले तर त्यांचे गुण चेन्नईपेक्षा जास्त होतील. 


दुसऱ्या क्रमांकावर असूनही चेन्नई प्लेऑफमधून कशी बाहेर जाईल? 


लखनौ आणि चेन्नई संघांनी आपापले सामने जिंकल्यास ते चेन्नईला मागे टाकून प्लेऑफसाठी पात्र ठरतील. यानंतर चेन्नई सर्वात मोठा धोका विराट कोहलीच्या बंगळुरू संघाकडून असेल, ज्यांच्याकडे सध्या 12 सामन्यांत 12 गुण आहेत. आरसीबीला अजून दोन सामने खेळायचे आहेत. जर RCB संघानं आपले दोन्ही सामने जिंकल्यास चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि बंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरेल.


चेन्नई त्यांचा शेवटचा सामना हरला, तसेच लखनौ, मुंबई आणि बंगळुरू संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर तिघेही प्लेऑफसाठी पात्र ठरतील. आणि चेन्नईचं आव्हान संपुष्टात येईल. 


सीएसकेला प्लेऑफ गाठायचं असेल तर काय करावं लागेल? 


चेन्नईला प्लेऑफ गाठायचं असेल तर मात्र शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र चेन्नई शेवटचा सामना हरलाच तर मात्र, प्लेऑफची वाट त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असेल. जर चेन्नई शेवटचा सामना हरली, तर मग प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईकडे दुसरा मार्ग कोणता? 


याचं साधं उत्तर असं आहे की, शेवटचा सामना गमावल्यानंतरही चेन्नई, लखनौ आणि मुंबई यांच्यापैकी एकानंही त्यांचा शेवटचा सामना गमावला, तर मात्र चेन्नईसाठी प्लेऑफ गाठणं शक्य आहे. दोघांनी आपापले सामने जिंकल्यास सर्वांच्या नजरा आरसीबीवर असतील. 


बंगळुरूनं उरलेल्या 2 पैकी एकही सामना गमावला तर चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तर, लखनौचा शेवटचा सामना 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबत खेळायचा आहे. मुंबईला 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. चेन्नईचा संघ 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. तसेच, बंगळुरू संघाला 18 मे रोजी हैदराबादविरुद्ध 13वा सामना खेळायचा आहे. तर शेवटचा सामना 21 मे रोजी गुजरातविरुद्ध होणार आहे.