बँगळुरु : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा चार विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या आयपीएलमधला तिसरा विजय साजरा केला. तर बँगलोरचे पहिल्या विजयाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं आहे. या सामन्यात बँगलोरनं दिल्लीसमोर विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्लीने हे आव्हान चार विकेट्स आणि सात चेंडू राखून पार केले. अय्यरने 50 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 67 धावा फटकावल्या. त्याआधी कगिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिसच्या प्रभावी आक्रमणासमोर बँगलोरला आठ बाद 149 धावांपर्यंतच मजल मारता आली.


बँगलोरच्या तगड्या फलंदाजांना आज पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आजच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीवगळता बँगलोरच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत असल्यामुळे विराट कोहलीवर खूप दबाव आला होता. या दबावामुळे कोहली धिम्या गतीने खेळत होता. कोहलीने 33 चेंडूत 41 केल्या. अखेरच्या काही षटकात मोईन अलीने तीन षटकारांच्या सहाय्याने 18 चेंडूत 32 धवांची खेळी केली. कोहली आणि अलीच्या फलंदाजीच्या जोरावर बँगलोरने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या. कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 बळी घेतले.

150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात टीम साउथीने शिखर धवनला बाद केले. त्यानंतर पृथ्वी आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. पृथ्वीने 22 चेंडूंत 28 धावा केल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरच्या 50 चेंडूत 67 धावांच्या जोरावर दिल्लीने आजचा सामना जिंकला.