यंदाच्या आयपीएलचा मुहूर्त ठरला, सामन्यांच्या वेळेतही बदल
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2018 07:43 PM (IST)
उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे.
नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिल रोजी मुंबईतून होईल, तर अंतिम सामना मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाईल. उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या प्रशासकीय समितीने वेळापत्रकासोबतच यावर्षी सामन्याच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुपारी चार वाजता आणि रात्री आठ वाजता सामना सुरु व्हायचा, त्यात आता बदल करण्यात आला आहे. प्रसारकांनी सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आग्रह धरला होता आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीने तो आग्रह मान्य केला आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली. आठ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आता सात वाजता सुरु होईल आणि दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या सामन्याचं प्रक्षेपण सायंकाळी साडे पाच वाजता होईल, असं राजीव शुक्ला यांनी सांगितलं. किंग्ज इलेव्हन पंजाब आपले चार सामने मोहालीत, तर तीन सामने इंदूरमध्ये खेळणार आहे. दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबतचा निर्णय राजस्थान हायकोर्टाच्या 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर घेतला जाईल. यंदाच्या आयपीएलसाठी 27 आणि 28 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे, ज्यात 360 भारतीयांसह 578 खेळाडूंवर बोली लावली जाईल.