मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुरली विजयच्या साथीनं भारतीय डावाची सुरुवात कोण करणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.


कारण शिखर धवन, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे तिघेही दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीत स्थान मिळवू शकले नाहीत.  त्यामुळे गौतम गंभीरच सलामीला येण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा सलामीचा एकेक फलंदाज दुखापतग्रस्त होत राहिला आणि इंदूरच्या तिसऱ्या कसोटीत गौतम गंभीरनं दोन वर्षांनी पुनरागमन साजरं केलं.

गंभीरनं ओडिशाविरुद्धच्या रणजी सामन्यात 147 धावांची खेळी उभारून आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी गंभीरला पुन्हा संधी मिळणार का, हा प्रश्न अनुत्तरीत होता. पण याचं उत्तर आज मिळालं. गंभीरची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत लोकेश राहुलला झालेल्या दुखापतीमुळं गौतम गंभीर भारताच्या पंधरा सदस्यीय संघात संधी देण्यात आली होती. मग कोलकाता कसोटीत शिखर धवनच्या बोटांना दुखापत झाली आणि इंदूर कसोटीसाठी गंभीरला अकराजणांच्या अंतिम संघाचं दार उघडलं. पण आता लोकेश राहुल आणि शिखर धवन हे अद्याप दुखापतग्रस्त असल्यामुळे, त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे.

त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गौतम गंभीरच मुरली विजयसोबत सलामीला येणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, करुण नायर, मुरली विजय, आर अश्विन, रिद्धीमान साहा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, जयंत यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा

संबंधित बातमी

ईशांत शर्माचं पुनरागमन, रोहित शर्माला वगळलं