पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा संघातून बाहेर झाले आहेत. दुसरा कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे.


भारतासाठी हा दुसरा झटका आहे. कारण घोट्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर पृथ्वी शॉ आधीच संघाबाहेर आहे. आता आर अश्विन आणि रोहित शर्मा यांनीही दुखापतीमुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

अश्विन, रोहित आणि पृथ्वी यांच्याऐवजी अष्टपैलू हनुमा विहारी, जलदगती गोलंदाज उमेश यादव आणि रवींद्र जाडेजा यांचा 13 सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे.

अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माची कंबर दुखावली असून अश्विनला ओटीपोटाच्या दुखण्याचा त्रास झाला आहे. तर अॅडलेड कसोटीआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापतीमुळे या तिघांनाही भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघाने अॅडलेड कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली होती. पुजारा वगळता जवळपास सगळे फलंदाज अपयशी ठरले, पण गोलंदाजांनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयाचा शिल्पकार ठरलेला अश्विन आता पर्थ कसोटीत खेळणार नाही. आता त्याच्या जागी सामील झालेला जाडेजाची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा 13 सदस्यीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव