क्वालालंपूर : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हॉकीच्या टीमने तमाम भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रुपिंदर पाल सिंग, अफ्फान युसूफ आणि निकिन तिमय्याच्या गोल्सच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला 3-2 अशी धूळ चारली आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं.


भारतानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2011 साली पहिल्यावहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत पाकिस्तानला हरवूनच विजेता ठरला होता. तर 2012 साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. दोन्ही वेळा भारतानं पाकिस्तानचाच मुकाबला केला होता.

यंदाही अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानमधला सामना अपेक्षेप्रमाणेच चुरशीचा ठरला. भारताकडून रुपिंदर पाल सिंगनं 18 व्या मिनिटाला गोल केला तर पाकिस्तानच्या मुहम्मद अलीम बिलालनं 26 व्या मिनिटाला बरोबरी साधली. मग अफ्फान युसूफनं 23 व्या मिनिटाला भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर पाकिस्तानच्या अली शाहनं 38 व्या मिनिटाला बरोबरी साधली. अखेर 51 व्या मिनिटाला निक्किन तिमय्यानं भारताचा विजयी गोल केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकीपटूंनी मलेशियात जणू दिवाळी साजरी केली.

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर एकीकडे टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून मालिका खिशात घातली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी भारताने क्रीडा क्षेत्रात तिरंगा फडकावला आहे.