कोलकाता: मलाही विश्रांतीची गरज असते, मी रोबोट नाही, हवं तर माझी कातडं कापून बघा, त्यातून रक्त येईल आणि मी माणूसच असल्याचं कळेल, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिली.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या म्हणजेच गुरुवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत, कोहलीने खेळाडूंच्या विश्रांतीबाबत भाष्य केलं.

सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे असं कोहली म्हणाला.

कोहली म्हणाला, “क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांतीची गरज असते. मलाही विश्रांतीची गरज असते. मला विश्रांतीची गरज का नसावी? माझ्या शरीराला जेव्हा विश्रांतीची गरज असेल, तेव्हा विश्रांती घ्यावीच लागेल. मी रोबोट नाही. माझं कातडं कापून तुम्ही बघू शकता”.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात हार्दिक पंड्याला विश्रांती दिल्याबाबत विराटला विचारलं असता, विराट म्हणाला आता मलाही विश्रांतीची गरज आहे.

सध्या विराटलाही विश्रांती देण्याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या विराटला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे.

कोहली हा गेल्या वर्षभरात सर्वाधिक क्रिकेट खेळणारा जगातील एकमेव  क्रिकेटर आहे. त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याची चर्चा सुरु आहे.