रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियानं रांचीच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला स्वस्तात रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. पण त्यानंतर आलेल्या पावसानं भारतासमोरचं आव्हान कठीण केलं. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर सहा षटकांत विजयासाठी ४८ धावांचं आव्हान होतं.

सलामीचा रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला, पण शिखर धवन आणि विराट कोहलीच्या टोलेबाजीनं टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. त्याआधी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करून ऑस्ट्रेलियाला १९व्या षटकांत आठ बाद ११८ धावांत रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी एकेक विकेट काढली.