रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाने रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला भारताने पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला आहे. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 133 धावांत गुंडाळला.


भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर आणि दुसरा 133 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे. भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. भारताकडून दोन्ही डावात मिळून उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 5, शाबाज नदीमने 4, रवींद्र जाडेजाने 3, आर अश्विनने एक विकेट घेतली.


त्याआधी पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या झुबेर हमजा एकमेव या फलंदाजाचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 162 धावांत आटोपला. त्यामुळे पाहुण्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती.


तर टीम इंडियाने आपला पहिला डाव नऊ बाद 497 धावांवर घोषित केला होता. सलामीवीर रोहित शर्माने कसोटीत कारकीर्दीतलं पहिलं द्विशतक झळकावलं. रोहितने 212 धावांची द्विशतकीय खेळी केली, तर अजिंक्य रहाणेनंही 115 धावांची खेळी उभारली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडेने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर कगिसो रबाडानं तीन विकेट्स घेतल्या.


संबंधित बातम्या