सिंगापूर: भारतीय महिला हॉकी संघानं चीनवर 2-1 अशी मात करुन, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या 30 सेकंदात दीपिका ठाकूरने पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसरा गोल करुन सामना जिंकला.


सिंगापूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दीप ग्रेस इक्कानं तेराव्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं होतं. पण झोन्ग मेन्गलिन्गच्या गोलमुळं चीननं 44व्या मिनिटाला बरोबरी साधली. सामना संपण्यास अवघी तीस सेकंद बाकी असताना दीपिकानं गोल झळकावून भारताच्या 2-1 अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय महिलांनी पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. याआधी 2013 साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

महिला हॉकी संघाच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर हॉकी संघावर अभिनंदनाचा वर्षावर होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, महानायक अमिताभ बच्चन आदींनी महिला हॉकी टीमचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे.